

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : कणकवली येथून हरकुळ-बुद्रुककडे जात असताना भरधाव दुचाकी एस.टी. बसवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सागर मारुती घाडीगावकर (वय 27, रा. हरकूळ-बु. बोंडकवाडी) हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला सुनील सूर्यकांत ठाकूर (45, रा. हरकूळ-बु.काळेथरवाडी) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, उपचारापूर्वीच मयत झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी 5.15 वा. च्या सुमारास कणकवली-कनेडी मार्गावर कणकवली- शिवशक्तीनगरनजीक घडला.
कणकवली आगाराचे चालक शिवाजी ढोणे हे हरकूळ बुद्रुक-भटवाडी-कणकवली बसफेरी घेऊन येत असताना शिवशक्तीनगर फाट्यानजीक कणकवलीकडून येणारे दुचाकीस्वार सागर घाडीगावकर आणि सुनील ठाकूर यांच्या दुचाकीची जोरदार धडक एस.टी.बसला चालकाकडील बाजूने बसली. ही धडक एवढी भीषण होती की, सागर घाडीगावकर आणि सुनील ठाकूर या दोघांच्या डोक्याला गंभीररीत्या दुखापत झाली. तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना
स्थानिकांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले. पण सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनील ठाकूर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला.
या अपघाताची माहिती मिळताच हरकुळ बु. सरपंच बंडू ठाकूर, माजी सरपंच बुलंद पटेल, राजू पेडणेकर, नित्यानंद चिंदरकर, अनिल खोचरे, समीर ठाकूर, मनिष ठाकूर, पोलीस पाटील संतोष तांबे तसेच भाजपचे संदेश सावंत, मिलींद मेस्त्री आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत या अपघाताची माहिती घेतली. कणकवली आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. पडोळे यांच्यासह एसटी कर्मचारीही उपजिल्हा रुग्णालयात आले होते.
अपघातात मयत दोन्ही तरुण कणकवलीत काम आटोपून हरकुळ बु.कडे घरी निघाले होते. सागर हा गवंडीकाम करत असे तर सुनील ठाकूर हा गावातच काम करत असे. सुनील ठाकूर याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तर सागरच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हरकुळ बु. गावात हळहळ व्यक्त होत आहे.