चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देणार: एकनाथ शिंदे यांची घोषणा | पुढारी

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देणार: एकनाथ शिंदे यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग संपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. येथील पर्यटन वाढीसाठी सर्वकाही करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आंबोलीत नवीन हिल स्टेशन उभारण्यात येईल, मुंबई- गोवा महामार्गाला चालना देण्यात येईल. तसेच चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.६) सावंतवाडी येथे केली. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबविण्यात आले होते, असा टोला महाविकास आघाडीला लगावून आम्ही सत्तेवर आल्यानंतर सर्व प्रकल्पांना गती दिली आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने दिला नसेल, इतका निधी सिंधुदुर्गाला दिला आहे. कोकणात पर्यटन वाढीसाठी सर्वकाही करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. कोकणात निसर्ग संपन्नता आहे. त्यामुळे पर्यटनवाढी लागणारा निधी राज्य सरकारकडून कमी पडू देणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लघु सुक्ष्म मंत्रालयाकडे असलेल्या सर्व योजना आपण घेण्यास कमी पडणार नाही.

सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गातील महत्त्वाचा जिल्हा आहे. येथील व्यापारी, कारगीरांना सुविधा देण्यात येतील. येथील विकासकामांना गती देण्यासाठी ११० कोटींचा भरघोस निधी देण्यात आला आहे. आणखी निधी देण्यास सरकार कमी पडणार नाही. महिला गटांना सक्षम करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. खेळाडुंना वाव देण्यासाठी कोकणात तीन क्रीडा संकुल बांधण्यात येतील, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यातील आपलं सरकार लोकांना न्याय देणारे आहे, असे ते म्हणाले.

कोकण ही पर्यटनाची पंढरी आहे. सिंधुदुर्ग पर्यटन दृष्ट्या विकास करायचा आहे. त्यामुळे पर्यटनाची एकही संधी गमावणार नाही. आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध करून देऊ. तसेच या ठिकाणी रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना रोजगाराची संधी, कच्च्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध प्रकल्पामुळे सावंतवाडी शहराचा निश्चितच विकास होणार आहे, असे त्यांनी सांगितले. आंबोली पर्यटनस्थळ विकासासाठी जे जे करता येईल ते करणार आहे. सिंधू रत्न योजनेला लागेल ती मदत करणार आहे. केसरकर यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, तळकोकणात गतिमान विकास होत आहे. दरडोई उत्पन्न, जीडीपी वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५३ योजना राबविल्या आहेत. दरडोई उत्पन्न वाढवून आत्मनिर्भर व महासत्ता भारत निर्माण करूया, असे आवाहन त्यांनी केले. मंत्री केसरकर यांनी मागणी केलेल्या विविध विकास कामांना मुख्यमंत्री निधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी केंद्रीय मंंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार नितेश राणे, आमदार भरत गोगावले, माजी खा. निलेश राणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अमित कामत, युवराज लखमराजे भोसले, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सचिन वालावलकर, मेडिकल काॅलेजचे डीन डॉ. प्रकाश गुरव, डॉ. बी.एस नागरगोते, उपसंचालक डॉ. प्रेमानंद कलकुटे, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. संदीप नवांगुळ डॉ. दिपाली घाटे, डॉ. विनया बाड, आसावरी केळबाईकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button