Barsu Oil Refinery Project : कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला ‘दाक्षिणायन’चा पाठिंबा | पुढारी

Barsu Oil Refinery Project : कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला ‘दाक्षिणायन’चा पाठिंबा

रत्नागिरी; पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध अधिकाधिक तीव्र होत आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण, त्यातून जैविक सृष्टीचा विनाश या गंभीर कारणांवरुन ग्रामस्थांनी जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकारात महाराष्ट्रातील मान्यवर लेखक कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ‘दक्षिणायन’ने पाठिंबा दिला आहे. (Barsu Oil Refinery Project)

कोकण हा पृथ्वीवरील, औद्योगिकरणाच्या कचाट्यातुन अजूनही बऱ्याच प्रमाणात वाचलेला आणि जैविक विविधतेने मानवी अस्तित्वासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा ठेवा आहे. म्हणून तेथील सर्वसामान्य लोकांनी आजवर येऊ घातलेल्या प्रदूषणकारी प्रकल्पाला प्राण पणाला लावून विरोध केला आहे. यापूर्वी गेल्या वीस वर्षांत कोकणात गुहागरमध्ये तवसाळ येथे व राजापूरमध्ये नाणार येथील रिफायनरी प्रकल्पांना विरोध झाल्याने ते प्रकल्प सरकारला रद्द करावे लागले. परंतु, बारसू येथे येऊ घातलेल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे समर्थन तथाकथित विकासाचे कारण दाखवून केले जात आहे. (Barsu Oil Refinery Project)

शाश्वत विकासाच्या पर्यावरणपूरक संकल्पनेला नाकारून नवभांडवलशाही प्रवुत्ती ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला विकास हवा आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी लोकांच्या हाताला काम देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे सांगितले जात आहे. व्यापक हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी त्याग करायला पाहिजे, असे आवाहन केले जात आहे. परंतु साम्राज्यवादी शक्तींचा यामागील स्वार्थी व विनाशकारी हेतू ग्रामस्थांना समजावून सांगण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी नेटाने आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे. (Barsu Oil Refinery Project)

बारसू येथे प्रस्तावित असलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याला (रिफायनरीला) व इतर अनेक गावांत होणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्प, प्लास्टिक निर्माण, औष्णिक वीजनिर्मिती, धरण इ. संलग्न कारखाने – प्रकल्पांना ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. हा विरोध घटनात्मक पध्दतीने स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांमधे रितसर ठराव मंजूर करून व ते शासनाला सर्व स्तरावर देऊन व्यक्त झाला आहे.

देशाला १९ टन कच्च्या तेलाची गरज

मुळात देशाची गरज १९ कोटी टन कच्च्या तेलाच्या शुध्दीकरणाची गरज असताना २४ कोटी टन तेल शुध्दीकरण केले जात आहे. अधिकचे तेल युरोपला निर्यात केले जाते. तेथील सरकारे व सत्ताधारी स्वतःच्या देशात प्रदूषण न करता ते भारतात करून घेतात. रिफायनरी व एकूणच औद्योगिकरणाबाबत सध्याच्या परिस्थितीत सत्याला धरून विचार व्हावा.

या सर्वांचा विचार करुन बारसू प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कोकणातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला दक्षिणायनच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ व मान्यवर लेखक-कवी, पत्रकार व कलाकार यांनी पाठिंबा आहे, एका पत्रकाद्वारे दक्षिणायन महाराष्ट्राचे निमंत्रक संदेश भंडारे आणि प्रमोद मुनघाटे यांनी याबाबतची भूमिका जाहीर केली आहे.

बारसू रिफायनरी आंदोलकांच्या समर्थनार्थ दक्षिणायणच्या माध्यमातून गणेश देवी, महेश एलकुंचवार, रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, छाया दातार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, प्रज्ञा दया पवार, राजन गवस, अनुराधा पाटील, कौतिकराव ठाले पाटील, इब्राहिम अफगाण, निरंजन टाकले, प्रवीण बांदेकर, अभय कांता, प्रमोद मुजुमदार, संध्या नारे पवार, अजय कांडर, किरण गुरव, रणधीर शिंदे, नीतीन रिंढे, प्रभू राजगडकर, संजीव चांदोरकर, प्रफुल्ल शिलेदार, कुसुम अलाम, राम काळुंखे, गोविंद काजरेकर, अमिताभ पावडे संजीवनी पावडे, दत्ता घोलप, अनुराधा पाटील, कौतिकराव ठाले पाटील, संजीव चांदोरकर, प्रफुल्ल शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, निशा साळगावकर, दीपा पळशीकर, माधव पळशीकर, छाया सावरकर, अपर्णा फडके, रणजित मेश्राम आदी मान्यवरांनी सहमती दिलेली आहे.

अधिक वाचा :

Back to top button