अजित पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटली : रामदास कदमांचा घणाघात | पुढारी

अजित पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटली : रामदास कदमांचा घणाघात

खेड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली, त्यांना आधी जाब विचारा, अशी टीका रामदास कदम यांनी आज (दि.२) केली. महाविकास आघाडीच्या मुंबईत सोमवारी झालेल्या वज्रमुठ सभेत शिंदे- फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रत्त्युत्तर दिले.

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. तर अजितदादांचे उपमुख्यमंत्री पद गेले. त्यामुळेच थयथयाट सुरू आहे. अजित पवार यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले. राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी वाटप करून अजित पवार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. वज्रमुठ सभेत टीका नाही तर थयथयाट केला. टीका करण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दाच आहे कुठे? उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले. तर अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद व अर्थखाते गेल्याने सध्या त्यांचा थयथयाट सुरू आहे.

अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना गुळाचा मुख्यमंत्री बनवून राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोट्यवधींचा निधी दिला. त्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले, अशी टीका रामदास कदम यांनी केली. तसेच निवडणुका घ्यायला आम्ही केंव्हाही तयार आहोत. पण ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाहीत ? असा सवाल करत दुसऱ्याकडे एक बोट केले, तर चार बोटे आपल्याकडे दाखवत असतात. याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असेही कदम म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button