रायगड : आंग्रे घराण्याचे शाही शस्त्रपूजन; ३२२ वर्षांची विजयादशमीची अखंड परंपरा | पुढारी

रायगड : आंग्रे घराण्याचे शाही शस्त्रपूजन; ३२२ वर्षांची विजयादशमीची अखंड परंपरा

अलिबाग; जयंत धुळप : मराठा साम्राज्याच्या स्थापनेत शस्त्रांचे महत्व अनन्य साधारण होते. या शस्त्रांच्या माध्यमातून परकियांबरोबरच्या लढाया यशस्वी होऊन, स्वकीय रयतेला सुखाचे आणि आनंदाचे राज्य प्राप्त होऊ शकले. त्यामुळे विजया दशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करुन त्या शस्त्रांच्या प्रती पवित्र आदरभाव व्यक्त करण्याच्या हेतूने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी इ.स. 1700 मध्ये प्रारंभ केलेल्या विजया दशमीच्या दिवशीच्या शस्त्रपूजेची परंपरा गेली 322 वर्ष आंग्रे घराण्यात आजही अबाधित आहे. ही माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना दिली आहे.

बुधवारी विजयदशमीच्या दिवशी रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील ‘घेरीया’ या निवासस्थानी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या पासूनच्या प्रत्यक्ष वापरातील आठ पिढ्यांच्या शस्त्रांची प्राचीन परंपरेनुसार विधीवत पूजा करण्यात आली. त्या निमित्ताने रघूजीराजे आंग्रे बोलत होते. प्राचीन शस्त्रांची माहिती देताना रघूजीराजे आंग्रे पुढे म्हणाले, शस्त्र चालवायला मनगटात शक्ती येण्याची गजर असते, आणि त्याकरिता मनात ताकद आणि मनावरचे नियंत्रण अत्यंत महत्वाचे असते.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आठ पिढ्यांची एकुण सुमारे 60 विविध प्रकारची शस्त्रे रघुजीराजे आंग्रे यांनी अत्यंत काळजीपूर्वक जतन करुन ठेवीली आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी स्वतः प्रत्यक्ष युद्धात वापरलेली ‘तोफ’ ही तलवार आहे. दमास्कर स्टील पासून बनवलेली ही तलवार तब्बल 5 किलो 300 ग्रॅम वजनाची असून, तीची लांबी 40 इंच आणि रुंदी 3 इंच आहे. या शिवाय सरखेलांची सेरेमोनीयल तलवार ही देखील वैशिष्ठ्यपूर्ण तलवार असून या तलवारीची मुठ सोन्याची असून पाते पोलादी आहेत. सेरेमोनीयल तलवार लढाईत वापरण्यात येत नाही. ती दरबारात वा शाही कार्यक्रमात सरखेल कान्होजीराजे आंग्रे वापरत असत अशी माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली.

या महत्वपूर्ण तलवारी व्यतिरिक्त ‘गुर्द्र’ ही वेशिष्ठ्यपूर्ण तलवार या मध्ये आहे. या तलवारीच्या पात्याला धार नसते मात्र तीच्या टोकाला पोलादी डोके असते. शत्रूवर या तलवारीचा प्रहार झाला तर शत्रू 100 टक्के जायबंदी होणारच असे कर्तृत्व या तलवारीचे होते. अन्य तलवारींमध्ये फिरंग आणि कर्नाटकी थोप या तलवारी महत्वाच्या आहेत. या बरोबर आरमारी व नियमित असे दोन प्रकारचे भाले, विविध लांबीच्या गुप्त्या, परशू आणि कुर्‍हाडी, दांडपट्टा, मराठा तलवारी, कट्यारी, जांबीया आणि बंदूकांचा समावेश आहे.

हेही वाचा

Back to top button