रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी | पुढारी

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षीपासून सुरू करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी 522 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. दिल्ली येथे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नूतन मंत्री उदय सामंत यांनी दिली.

झूमद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रथमदर्शनी जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारत आवारात हे शासकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. मनोरुग्णालयाची सुमारे 14 एकर जागा असून, त्यातील चार एकर जागेत नूतन इमारत व होस्टेलची उभारणी केली जाणार आहे. यासाठी आवश्यक 20 एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी 25 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन इमारतीसाठी 114 कोटी 77 लाख, यंत्रसामग्रीसाठी 120 कोटी असे 259 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी तीन वर्षांसाठी 105 कोटी रुपये, 31 कोटी आवर्ती खर्च व अन्य मिळून एकूण 522 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. हे वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत तीन वर्षात पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल ना. सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रश्न मार्गी असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचे आपले स्वप्न असून त्या दृष्टीने सुरु असलेले उपक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपण दि. 14 ऑगस्टपासून जिल्हा दौर्‍यावर येत असून आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात प्राधान्याने आढावा घेणार आहे. त्यानंतर चिपळूण येथे वाशिष्ठीची पाहणी व अधिकार्‍यांशी चर्चा केली जाणार आहे. संगमेश्वर येथून थेट रत्नागिरीत येऊन मारुती मंदिर येथील शिवसृष्टीचे उद्घाटन सोहळा होणार आहे. याचवेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या उभारण्यात आलेल्या स्मृतिशिल्पाचा शुभारंभ होणार आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यात नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या पूरस्थितीचा आपण आढावा घेतला असून अधिकार्‍यांना सूचना दिल्या असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

Back to top button