गुहागर : जयगड समुद्रात पलटी झालेली सिंगापूरची तेलवाहू बार्ज पालशेत किनारी
गुहागर शहर; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी जयगड समुद्रात पलटी झालेली सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीची बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आली आहे. सिंगापूर येथून तेल घेऊन आलेली बार्ज रविवारी १७ जुलैला रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील १३ नॉटीकल मैल खोल समुद्रात आली असता सकाळी ९.३० च्या सुमारास पलटी झाली. त्यामुळे बार्ज मधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत.
या बार्जवरील कर्माचारी सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तूंबाबत समजून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पालशेत येथील समुद्रात एक जहाज पलटी झाले असल्याचा फोटो सोशल मीडियावर फिरत होता. यानंतर याबाबतची माहिती प्रशासनाने अधिकृतरित्या दिली व कोणत्याही संशयित वस्तूंबाबत माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.