जे दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचे : उदय सामंत | पुढारी

जे दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचे : उदय सामंत

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटतं की, कुठंतरी सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय कल्लोळ सुरु असताना शुक्रवारी रत्नागिरीचे आमदार व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पाली येथील निवासस्थानी आले. गेले तीन-चार दिवस पक्षाच्या विविध बैठकांना ते उपस्थित होते. ना. सामंत घरी आल्याचे समजल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांच्या निवासस्थानी रिग लावली होती.

या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी देखील गुवाहाटीला गेलो आशा बातम्या आल्या, पण मी आता रत्नागिरीतल्या पाली येथील माझ्या घरी आलो आहे. मी शिवसेनेतच आहे असं शिवसेनेच उपनेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ठ केलं आहे. यावेळी सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची भूमिका सुरवातीपासूनच पक्षाला कळली नाही, पक्षप्रमुखांपयर्र्त ती पोहोचली नाही. ती भूमिका मांडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझी भूमिका मी शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये मांडलेली आहे. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटतं की कुठंतरी सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे, जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे असे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर झाले पाहिजेत. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, असे ना. सामंत यावेळी म्हणाले. सध्याच्या परिस्थितीशी बोलताना ते म्हणाले की, आमच्या प्रतोदानी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदानी काढलेली नोटीस त्यामध्ये टेक्निकली बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल, पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे आणि कायदेशीर लढाईला आम्हाला सामोरं गेलं पाहिजे असं ना. सामंत यावेळी म्हणाले. मी जोडणारा आहे तोडणारा नाही, मला हे सर्व जोडावं असं वाटतं असं ना. सामंत म्हणाले.

रत्नागिरीत आलेल्या ना.उदय सामंत यांनी सकाळपासूनच आपल्या विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. सकाळी प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर ना.सामंत यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गणनिहाय कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  त्यानंतर युवा सेना, तसेच शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी यांच्याशी ना.सामंत यांनी चर्चा केली.

Back to top button