रत्नागिरी : पश्‍चिम घाटात 223 दरडग्रस्त गावे;कोकणातील चार जिल्ह्यांचा समावेश | पुढारी

रत्नागिरी : पश्‍चिम घाटात 223 दरडग्रस्त गावे;कोकणातील चार जिल्ह्यांचा समावेश

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

पश्‍चिम घाटातील कोकणातील चार जिल्ह्यांत 223 दरडग्रस्त गावे असल्याचे शासकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे 371 पूरप्रवण गावे असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे नैसर्गिक आपत्ती ओढविण्याची भीती आहे. या गावांचा पुनर्वसन आराखडा तयार होणे आवश्यक आहे.

गेल्या दोन वर्षांत कोकणातील एकूण 27 गावांवर दरडी कोसळल्या. यामध्ये महाड तालुक्यातील तळीये गाव पूर्ण मातीच्या ढिगार्‍याखाली आल्याने मोठी जीवितहानी झाली. सध्यस्थितीत ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पालघर अशा सात तालुक्यांमध्ये दरडींचा धोका लक्षात घेऊन विशेष तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील नांदेड आणि गडचिरोली यांचीही दरडग्रस्त जिल्हे म्हणून नोंद आहे. सात जिल्हे, पन्‍नास तालुके आणि 6 हजार 353 गावे असलेल्या या तालुक्यामध्ये सरासरी 3 हजार 668 मिलिमीटर पाऊस पडतो. कमी कालावधीत जास्त पाऊस होणार्‍या जिल्ह्यांत मुंबई आणि ठाण्याचा समावेश आहे.

अतिवृष्टी आणि भरतीची वेळ एकत्र आल्यास मोठी पूरस्थिती निर्माण होते. गेल्या सहा वर्षांतील पावसाची सरासरी 3 हजार मिलिमीटर आहे. या सात तालुक्यांत 371 पूरप्रवण तर 223 दरडग्रस्त गावे आहेत. कोकण किनारपट्टीला यापूर्वी फयान, तोक्ते अशा चक्री वादळांनी सलग 2 वर्षे तडाखा दिला. यामुळे जीवनमान विस्कळीत झाले. महाड, चिपळूणला मागील वर्षी पुराचा मोठा तडाखा बसला. कोकणात सात जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर, सातार्‍यासाठी दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हास्तरीय आपत्ती निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे.

धरण प्रकल्पांवर आपत्ती काळात लक्ष…

रत्नागिरी जिल्ह्यात लघू प्रकल्प 28 आहेत. पैकी मोठे दोन, लघू 46 आहेत. सिंधुदुर्गात तिलारी हा मोठा प्रकल्प, देवघर मध्यम प्रकल्प, तर 234 लघू प्रकल्प असे कोकणात 10 मोठे, 3 माध्यम आणि 97 लघू प्रकल्प आहेत. या धरण प्रकल्पांच्या पाण्यावर संभाव्य आपत्ती काळात नजर ठेवली जाणार आहे. या आपत्ती निवारणासाठी 77 बोटी, 166 लाईफ जॅकेट जवान, 842 लाईफबोई तैनात केले जात आहे.

Back to top button