सावंतवाडी : ट्रकखाली चिरडून वेताळ बांबर्डेतील तरुण ठार | पुढारी

सावंतवाडी : ट्रकखाली चिरडून वेताळ बांबर्डेतील तरुण ठार

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
आंबोली घाटात कोल्हापूरला जाणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा चिरडून जागीच मृत्यू झाला. समीर शशिकांत जाधव (वय 39, रा. कुडाळ, वेताळ बांबर्डे) असे या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर झाला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीस्वार समीर जाधव हा सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने भरधाव जात होता. घाटातील नाना पाणी वळणावर आला समोरून चालणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समीर याने वेगाने दुचाकी हाकली; मात्र अचानक समोर वाहन आल्याने ओव्हरटेक करण्याचा अंदाज चुकला व भरधाव वेगात असलेली दुचाकी थेट ट्रकच्या मागीच्या चाकात घुसून अपघात झाला. या अपघातात समीर जाधव हा ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागून दोन मित्रही मोटारसायकलने येत होते. त्यांच्या डोळ्यादेखत हा अपघात झाल्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.

हा अपघात इतका भीषण होता की मृताच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी व आंबोली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून अपघाताचा पंचनामा केला. अपघातानंतर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.
अपघातप्रकरणी ट्रकचालक मुबारक हुसेन शेख (42 रा. चंदगड) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button