रत्नागिरीत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा परिणाम नाही | पुढारी

रत्नागिरीत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा परिणाम नाही

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रात काही विशेषत: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ एकच रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून आरोग्य विभागाने या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज केली असली तरी लसीकरणामुळे रुग्ण संख्या वाढणार नाही. नागरिकांनी केवळ खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आता वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केले जात आहे.
चौथ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्ह्याला पण देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोग्य यंत्रणा महिनाभर आधीच सज्ज झाली असली तरी या लाटेचा अंशत: परिणामही जिल्ह्यात दिसून येत नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब असून हजारो चाकरमानी मुंबईतून रत्नागिरीत दाखल झाले असले तरी कोणतेही लक्षणे नाही.
सध्या जिल्ह्यात एकच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्याचीही प्रकृती स्थिर असून ‘डिस्चार्ज’ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. अशा स्थितीत जरी काही प्रमाणात रुग्ण आढळले तरी रुग्णांवर परिणामकारक काही बदल होणार नाहीत. तरीही यंत्रणेने अलर्ट राहणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button