Nilesh Rane : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नीलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची | पुढारी

Nilesh Rane : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नीलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची

सिंधुदुर्गनगरी ; पुढारी वृत्तसेवा : आ. नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर काही काळ गंभीर वातावरण निर्माण झाले. जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. माजी खा. नीलेश राणे हे आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. मला कायदा शिकवू नका. (Nilesh Rane)

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आ. राणे यांना अटक करा, असे आदेश दिलेले नाहीत. आम्हाला इथे का अडविले? असा सवाल करत नीलेश राणे आक्रमक बनले. यावरून नीलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची झाली.

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी दाखल गुन्ह्यात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी भाजपचे आ. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्याने आ. नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

Nilesh Rane : तर नितेश राणेंना अटक होणार नाही

मात्र, सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशानुसार आ. नितेश राणे यांना 6 फेब्रुवारीपर्यंत अटक करता येणार नसल्याने आ. राणे मंगळवारी घरी जाऊ शकले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आ. नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाची ऑर्डर निघालेली नसतानाही आ. नितेश राणे न्यायालयाबाहेर पडण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी आ. राणे यांची गाडी अडविली. त्यामुळे माजी खासदार नीलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे न्यायालय परिसरातील वातावरण काही काळ गंभीर बनले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी कणकवलीत हल्ला झाला. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात आ. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात आपल्याला अटक होवू नये यासाठी आ. राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च नायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. (Nilesh Rane)

Nilesh Rane : नितेश राणेंना १० दिवसांची मुदत

आ. नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवार, दि. 24 जानेवारी रोजी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात हजर होण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने आ. नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.

या जामीन अर्जावर सुनावणी सोमवारी पूर्ण झाली होती. मंगळवारी यावर जिल्हा न्यायालयाने निर्णय देत आम. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

…म्हणून त्यांना पोलिसांनी अडविले : अ‍ॅड. प्रदीप घरत

आ. नितेश राणेंचा जामीन अर्ज मेंटेनेबल नाही म्हणत कोर्टाने जामीन फेटाळल्याची माहिती सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी दिली. आ. राणे यांनी आधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे शरण यावे आणि त्यानंतर जामीन अर्ज करावा, असे मत कोर्टाने नोंदवल्याची माहिती सरकारी वकिलांकडून देण्यात आली आहे.

आ. राणे हे संशयित आरोपी असून, ते सुनावणीवेळी कोर्टात बसायचे, त्यांनी कोर्टात मी शरण यायला तयार आहे, असेही सांगितले. त्यावर कोर्टात बराच युक्तिवाद झाला, न्यायालयीन दाखले दिले गेले. त्यानंतर नीतेश राणेंना एकतर जामीन घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवे होते नाहीतर त्यांना अटक करायला हवी होती, मात्र आमच्या युक्तिवादाप्रमाणे कोणतीही ऑर्डर झाली नाही.

कोर्टाची ऑर्डर येईपर्यंत सर्वांनी थांबणं गरजेचे होते, म्हणून पोलिसांनी नितेश राणेंना थांबवले, त्यावर लेखी ऑर्डर होणे गरजेचे होते, मात्र नितेश राणे यांनी शरणागतीबाबत कोणताही लेखी अर्ज न दिल्याने कोर्टाने तशी ऑर्डर देण्यास नकार दिल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. हा राणे यांना मागच्या दाराने जामीन दिल्याचा प्रकार होईल, असेही मत वकिलांनी नोंदवले. पोलिस सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आणि आजची ऑर्डर पडताळून पाहतील. त्यानंतर निर्णय घेतील, असेही ते म्हणाले आहेत.

पुन्हा उच्च न्यायालयात जाणार

मंगळवारी सत्र न्यायलायाने आ. राणे यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळल्याने आता पुन्हा ते हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांनी दिली. सुप्रीम कोर्टाने दहा दिवासांची मुदत दिल्यामुळे राणेंना दहा दिवस अटक होऊ शकत नाही, अशी माहिती आ. नितेश राणेंच्या वकिलांनी दिली. तर पोलिसांनी राणेंना अडवल्यावरून त्यांना विचारले असता ही पोलिसांची दादागिरी आहे.

पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला आहे, ते आम्ही उच्च न्यायालयात मांडू असेही राणेंचे वकील म्हणाले. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर आ. नितेश राणे यांच्या वतीने मुंबई येथील वकील सतीश मानेशिंदे, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. राजीव परुळेकर आदींनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. अविनाश परब, अ‍ॅड.सुहास साटम, अ‍ॅड. अशपाक शेख आदींनी सहकार्य केले.

Back to top button