केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यास आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना देऊ केलेली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत सोमवार (दि. १५) पर्यंत होती. खरीप २०२४ मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टल Wwww. pmfby. gov. in वर थेट ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जून २०२४ पासून सुरू केली होती व भाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२४ होता.
राज्यात या योजनेत ९५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्राच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर) माध्यमातून भरण्यात येतात. राज्य सरकारने दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारला देण्यात आला होता. तो मान्य झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सोमवारी (दि. १५ जुलै) सकाळी दहा वाजेपर्यंत या योजनेंतर्गत एक कोटी ३६ लाख विमा अर्ज शेतकऱ्यांनी केले. त्यातून खरीप हंगामातील सुमारे ९० लाख हेक्टर क्षेत्र विमासंरक्षित झालेले आहे. राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र १४२ लाख हेक्टर इतके आहे.