

Thane : पुढारी ऑनलाइन डेस्क - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये 2014 व 2019 मध्ये विधानसभा निवडणुक लढविलेल्या जुन्याच चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिली आहे. तर यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
डोंबिवली : मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी बुधवारी (दि.20) सकाळी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
त्यांच्या पत्नी योगिता आणि पुत्र आदित्य यांनीही काटई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे प्रत्येकाचा हक्क आणि ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले अमूल्य मत वाया जाता कामा नये, यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन राजू पाटील यांनी यावेळी पुढारी सोबत बोलताना केले.
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजेश मोरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मोरे हे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे उमेदवार आहेत.
राजेश मोरे यांनी सकाळी बालाजी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर पश्चिम डोंबिवलीच्या मोठागाव येथील केडीएमसीच्या मराठी शाळेत मतदान केले. मतदान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे. मी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले, तुम्हीही करा, असे आवाहन मोरे यांनी पुढारी सोबत बोलताना केले.