

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला (Maharashtra assembly special session) आज शनिवारपासून सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, भिवंडीचे आमदार रईस शेख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे वगळता महाविकास आघाडीतील इतर आमदारांनी ईव्हीएमच्या मुद्यावरुन आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले.
सपाचे आमदार अबू आझमी (Samajwadi party chief Abu Azmi) यांनी आज 'मविआ'च्या निर्णयाविरोधात फारकत घेत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची आझमींनी भूमिका घेतली आहे. 'मविआ'चे नेते ठाकरेंना भेटायला गेले असताना हे मतभेद उघडपणे दिसून आले. दरम्यान, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आज शपथ घेतली.
"EVMच्या वापराने लोकशाहीची हत्या होत असल्याने आम्ही आज शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेने दिलेला कौल नाही. हा EVM आणि भारतीय निवडणूक आयोगाचा जनादेश आहे..." असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आज आमचे आमदार शपथ घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. "आम्ही आज निर्णय घेतला आहे की आमचे (ठाकरे शिवसेना) नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार नाहीत. जर हा जनतेचा आदेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण लोकांनी आनंद साजरा केला नाही. आम्हाला EVM बद्दल शंका आहे.'' असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधानसभा परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून 'आय लव्ह मारकडवाडी'चे बॅनर झळकावले.
आज शपथ घेतल्यानंतर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्हाला त्यांच्याशी काय करायचे आहे? तिकीट वाटपाच्या वेळी आमच्याशी संपर्क साधला नाही. तसेच निवडणुकीदरम्यानही कोणताही समन्वय नव्हता. पण, जर का लोकांना 'ईव्हीएम'बद्दल शंका असेल तर मी ईव्हीएम नको, असा सल्ला देतो. मी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.