

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत अनुत्तरित आहे. या पार्श्वभूमीवर (Maharashtra government formation) बुधवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास ३५-४० मिनिटे चर्चा चालली.
गुरुवारी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते सुद्धा अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वीच विनोद तावडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि तावडे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. विद्यमान परिस्थिती आणि आगामी काळ पाहता राज्यात होत असलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महाराष्ट्रातील जातीय- सामाजिक समीकरणे या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा झाल्याची समजते.
२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले, असे असतानाही आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला उशीर होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि विनोद तावडे यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज गुरुवारी (दि.२८) दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक होत आहे. दिल्लीत होणार्या या बैठकीत महायुतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. यासोबतच पालकमंत्री, महामंडळे आणि भविष्यात येणार्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन डिसेंबर रोजी राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी ‘पुढारी’ला सांगितले.
महायुतीने राज्यात २३० जागा मिळवल्या आहेत. भाजप हा १३२ जागां जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. पण, निकाल लागून पाच दिवस उलटले तरी अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण? यावरुन सस्पेन्स संपलेला नाही. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. सरकार बनवताना माझी अडचण नको, असे मी त्यांना फोन करून सांगितले आहे, असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. त्यामुळे महायुतीचा सत्तास्थापनेचा आणि मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्रिपदी शिंदे राहणार की भाजपकडे हे पद जाणार, यावर गेले चार दिवस निर्माण झालेला तिढा यामुळे सुटला.