श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महासंकटात घरातील कर्ता पुरुष असलेला पती गमावल्यानंतर आयुष्याची घडी विस्कटली. अनेक महिलांच्या जीवनाची शिवण उसवली. अशा महिला आता मात्र आपली आयुष्याची उसवलेली शिवण पुन्हा शिवून संसाराचे तुटलेले धागे पुन्हा जोडण्यासाठी सरसावल्या आहेत.
कोरोनाना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पुढाकारातून अशा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आपली हक्काची रोजीरोटी कमावण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या महासंकटामध्ये पती गमावल्यानंतर राज्यभरात अनेक महिला एकट्या पडल्या. विधवा झाल्या. अशा महिलांना मदतीचा हात देण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचा जन्म झाला.
या समितीच्या माध्यमातून राज्यभरात जिल्हा व तालुकास्तरावर समाजसेवी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले. त्यांच्या माध्यमातून राज्यभरात कोरोना एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रयत्न व धडपड सुरू आहे. त्यातूनच राज्य सरकारने तालुकास्तरावर मिशन वात्सल्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीच्या माध्यमातून 25 कलमी कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या समितीच्या कामकाजाला म्हणावी तशी गती आली नसली तरी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून समितीचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या पाठपुरावातून विविध स्वयंसेवी संस्था व दानशूर यांच्या माध्यमातून एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रकारची मदत करण्यात येत आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना एकल महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले.
समितीच्या जिल्हा समन्वयक मनीषा कोकाटे, तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, डॉ. शेखर कोकाटे यांच्या हस्ते या शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कविता परभणे (उंबरगाव), ज्योती क्षिरसागर (लाडगाव ), मनीषा निकम (गळनिंब), दीपिका आस्थाना (श्रीरामपूर ) आदी महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.