शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांच्या प्रयत्नाने शेवगाव तालुक्यात 10 गावांत राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांमुळे संबंधित गावांचा पाणीप्रश्न सुटणार असून, हातगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रद्द झाल्याने, त्या अंतर्गत असणार्या 28 गावांतही जलजीवन योजना आधार देणार आहे. शेवगाव तालुक्यात शेवगाव-पाथर्डी, शहरटाकळी, बोधेगाव अशा प्रादेशिक योजनेत अनेक गावे समाविष्ठ झाली आहेत.
परंतु, काही गावे योजनेत नसल्याने तेथे सतत पाणीटंचाई जाणवत होती. आता केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा पन्नास-पन्नास टक्के हिस्सा असणारी राष्ट्रीय जलजीवन योजना तहानलेल्या गावांना आधार ठरताना दिसत आहे. तालुक्यात पाणीटंचाई असलेल्या 10 गावांत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले व पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या प्रयत्नाने जलजीवन योजनेतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत.
या योजनेतून वाघोली 1 कोटी 99 लाख, वडुले 1 कोटी 94 लाख, खामपिंप्री 56 लाख 94 हजार, खानापूर 1 कोटी, मळेगाव-शे 1 कोटी 28 लाख, विजयपूर 44 लाख 26 हजार, कोनोशी 1 कोटी 4 लाख, गोळेगाव 1 कोटी 7 लाख, भायगाव 1 कोटी 21 लाख, दहिगाव 4 कोटी 8 लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. यातून पाण्याची टाकी बांधणे, पाईपलाईन करणे, नवीन विहीर घेणे, अशी कामे होणार आहेत. त्यानंतर या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.
या व्यतिरिक्त मुंगी येथील सर्वेक्षण झाले आहे. तर, नागलवाडी गावाचा या योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव सादर झाला आहे.
हातगाव पाणीपुरवठा योजना रद्द
हातगाव व 28 गावांच्या प्रादेशिक योजनेचे काम काही वर्षापासून बंद होते. त्यामुळे लाभार्थी गावांनी या योजनेला विरोध केल्याने ही योजना रद्द करण्यात आली आहे. आता या योजनेतील गावांचा राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याचाही आराखडा सादर करण्यात आला आहे.