भोकर : पुढारी वृत्तसेवा : कालौघात जुन्या रूढी, परंपरा बदलत आहेत. बदलत्या रूढी, परंपरेचे प्रचिती श्रीरामपूरकरांनी अनुभवली. निधनानंतर अंतिम समयी मुलीने जन्मदात्या पित्याला पाणी पाजल्याने मुलगा अन् मुलीत काहीच फरक नाही, हा आदर्श एकुलत्या एक मुलीने समाजापुढे ठेवला.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावालगत नेहरूवाडी येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार सुभाष साळुंके गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. 7 मधील रामचंद्रनगर येथे राहतात. त्यांना एकुलती एक रूपाली ही मुलगी आहे. ती लाडात वाढली. तिने उच्च शिक्षण घेतले, तसे उच्च विचारही अंगीकारले.
रूपालीच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह पुणे येथील देवकर कुटुंंबात झाला. व्याही व जावई आधुनिक विचाराचे मिळाल्याने तिचा संसार सुखात सुरू आहे. एकीकडे ग्रामीण भागातील मुली लाजाळू. जुन्या रूढी, परंपरांमध्ये गुुरफटलेल्या काही मुली दिसतात, परंतु मुली कुठेच कमी नाहीत, हेच त्यांनी दाखवून दिले.
रूपाली यांचा अभिमान वाटला !
पित्याच्या अंत्यविधीप्रसंगी रूपाली यांनी हाती शिकाळी धरीत श्रीरामपूर येथील अमरधाममध्ये पित्याचे अंत्यसंस्काराचे सोपस्कार मुलासम पार पाडले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला रूपाली यांचा अभिमान वाटला. आज मुली कुठेच कमी नाहीत, हेच या मुलीने दाखवून दिले.