![नगर : सर आली धावून, रस्ते गेले वाहून!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2FNagar-Internal-roads.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून शासनाच्या विविध निधींतून शहर व उपनगरातील रस्त्यांसाठी 107 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्याची वाताहत झाली आहे. गुलमोहर रोड, चितळे रोड, जुना बाजार रोड आदींसह शहरातील छोट्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार झाल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. त्यातील काही रस्ते पूर्ण झाली आहेत. मात्र, काही रस्त्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. शहरातील चितळे रोड भाजीबाजार, चांद सुलताना हायस्कूल, जुन्या मनपा कार्यालयाचा कोपरा ते दो बोटी चिरापर्यंतचा रस्ता, गुलमोहर रोड, नालेगाव ते आयुर्वेद कॉर्नरपर्यंचा रस्ता, झेंडीगेट, बोल्हेगाव, केडगाव, मुकुंदनगर, तपोवन या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहेत.
पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व मालवाहू रिक्षा चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहरातील रस्ते विकासासाठी 107 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातील काही रस्त्यांची कामे अजूनही अपुरी आहेत. त्यात पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांची वाट लागली आहे.
खासगी कंपन्यांनी केबल, गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले आहेत. त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्डे पडले आहेत. या कंपन्यांकडून तत्काळ रस्ते दुरूस्त करून घेणे आवश्यक आहे. मात्र, मनपाचे दुर्लक्ष होत आहे.
मंजूर रस्त्यांची कामे 90 टक्के पूर्ण झाली. मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येतील. तर, काही रस्त्यांच्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.
– सुरेश इथापे, शहर अभियंता, मनपा