करंजी, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे शेतकरीच शेतकर्याच्या मुळावर उठल्याचे उदाहरण समोर आले आहे. शेतकर्याच्या शेतातील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक तणनाशक औषध टाकले. संबंधित शेतकर्याने डाळिंबावर फवारणी करण्यासाठी आणलेले किटकनाशक त्या पाण्याच्या टाकीत टाकून फवारणी केली. मात्र, तणनाशकामुळे डाळिंबाच्या झाडाची पाने पिवळी पडून गळाले. त्यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
दगडवाडी येथे बाबासाहेब देविदास शिंदे यांच्या मालकीचे शेत आहे. शेतातील दोनशे लिटरच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने गुपचुपपणे येऊन तणनाशक औषध टाकले. त्यानंतर शिंदे यांनी नेहमीप्रमाणे डाळिंबाच्या झाडावर कीटकनाशक औषध फवारणी करण्यासाठी त्याच दोनशे लिटरच्या टाकीमध्ये कृषी केंद्रातून आणलेली औषधे टाकून डाळिंबाच्या झाडावर फवारणी केली. परंतु, दोन-चार दिवसांनी डाळिंबाच्या झाडांची पाने फुले पिवळी पडू गळू लागली. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषध टाकल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले.
शिंदे यांनी यांच्या शेतात डाळिंबाची 350 झाडे आहेत. या झाडांवर ते नेहमी कीटकनाशक औषधांची फवारणी करत होते. डाळिंबाची बाग चांगली असल्याने शिंदे बागेची नेहमी काळजी घेत होते. सदर प्रकार घडल्यानंतर शिंदे यांनी कृषी अधिकारी, तसेच कृषी केंद्रचालक यांच्याकडे देखील याबाबत विचारणा केली. त्यानंतर मात्र कोणीतरी खोडसाळपणाने तणनाशक औषध पाण्याच्या टाकीत टाकले असावे, असा संशय व्यक्त करत शिंदे यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास करंजीचे पोलिस हवालदार चव्हाण, दळवी हे करत आहेत.