नगर, पुढारी वृत्तसेवा : लोकप्रतिनिधींवरील टक्केवारीचे गंभीर आरोप.. अर्धवट काम सोडून पसार झालेला ठेकेदार.. त्यामुळे प्रवाशांचे सुरू असलेले अतोनात हाल, अशा कारणांमुळे 'नगर-शिर्डी' राष्ट्रीय महामार्ग राज्यात चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, प्रवाशांनी अर्धवट कामासंदर्भात आवाज उठविल्यानंतर रस्ता दुरूस्तीसाठी आता थेट मुंबईचा ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. 19 ऑगस्टपासून प्रत्यक्षात कामाचे आदेश काढले जाणार आहेत. गणेशोत्सवापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा प्लॅन असल्याने 'बाप्पा' प्रवाशांना पावणार आहे.
'नगर-शिर्डी' या राष्ट्रीय महामार्गासाठी 420 कोटींचे कामे हाती घेण्यात आले होते. पुण्यातील शिंदे कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र, मे 2022 मध्येच ठेकेदार संबंधित काम सोडून पसार झाला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे काम बंदच होते. ठिकठिकाणी खोदकाम केलेले असल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल सुरू होते. या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी प्रवाशांमधून जोरदार मागणी सुरू होती. नगर बायपास ते सावळीविहीर दरम्यानच्या 75 कि.मी. अंतरावरील खड्डे दुरुस्तीसाठी 8.66 कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. वाशी मुंबई येथील जयहिंद एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. संबंधित कंपनी गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्षात 19 ऑगस्ट रोजी संबंधित कंपनीला वर्क ऑर्डर दिली जाणार असल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वीच मुंबईचा ठेकेदार लव्याजम्यासह नगरमध्ये दाखल झालेला आहे. ज्या ठिकाणी मोठी खड्डी आहेत, ती तातडीने बुजविली जाणार आहेत. त्यानंतर इतर दुरुस्तीचेही काम हाती घेतले जाणार आहेे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे.
तातडीने 'नगर-शिर्डी' राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. या दरम्यान, या महिनाअखेरीस या महामार्गाचे नूतनीकरण कामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार होणार आहे. साधारणतः 700 कोटींच्या आसपास हा खर्च असेल. या कामाचे टेंडर दिल्लीहून काढले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्या वर्षांत अर्थात 2023 मध्ये हे काम सुरू होईल. तो पर्यंत रस्त्याची डागडुजी आणि दुरुस्ती ही 'जयहिंद' कंपनीकडेच असणार आहे.
नगर बायपास ते सावळी विहीरदरम्यानच्या मार्ग दुरुस्तीचे काम मुंबई येथील कंपनीला मिळालेले आहे. 19 ऑगस्टपासून या कामाची वर्क ऑर्डर होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी संबंधित डागडुजीचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
– मिलिंद वाबळे, उपमहाप्रबंधक, तांत्रिक विभाग.