राहुरी; पुढारी वृत्तसेवा: मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आषाढी सरींची बरसात सुरू असल्याने पाणी साठ्यात वाढ होत आहे. मुळाने 10 हजार दलघफू पाणी पातळी ओलांडली आहे. पाणलोटात संततधार सुरूच असल्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास 10 हजार 738 क्यूसेस नव्या पाण्याची आवक झाली. मुळा पाणलोट क्षेत्रावर आषाढी सरी धो- धो कोसळत आहेत. सोमवारी पहाटे मुळा धरणाचा पाणी साठा 9 हजार 956 दलघफू इतका होता.
7 हजार 667 क्यूसेक पाण्याची धरणात आवक सुरू होती.दुपारी आवक वाढून 13 हजार 836 वर पोहचली. रात्री 10 हजार क्यूसेक प्रवाहाने आवक होत होती. पाणलोट क्षेत्र असलेल्या हरिश्चंद्रगड, पांजरे कोतूळ पट्यामध्ये पावसाचा जोर सुरूच आहे. कोतूळ सरिता मापन केंद्राच्या आकडेवारीनुसार सुमारे 2 हजार दलघफूटाने पाणी साठा वाढला. सद्यस्थितीला धरण साठा 40 टक्के झाला आहे.