भेंडा, पुढारी वृत्तसेवा : ज्या शेतकर्यांच्या शेतात विजेचे खांब, विद्युत रोहित्र, विजेचे मनोरे व त्यासाठीच्या वीज वाहिन्या आहेत, त्या शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे जागा भाड्याची मागणी करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे शरद आरगडे यांच्या पुढाकारातून परिसरातील शेतकर्यांसाठी शेतकरी संघटनेच्या सहकार्याने शेतातील वीज पुरवठा करणार्या साहित्याचे भाडे मिळण्याचे अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अॅड. काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. बाबा आरगडे होते. यावेळी शेतकरी नेते हरिभाऊ तुवर, तालुकाध्यक्ष त्र्यंबक भदगले, बाबासाहेब कोतकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, कॉ.अप्पासाहेब वाबळे, कॉ. भारत आरगडे, बाळासाहेब आरगडे, पत्रकार कारभारी गरड आदी उपस्थित होते.
संभाजीनगर खंडपीठाने अशा भाडे मागणी अर्जावर जिल्हाधिकारी यांनी 90 दिवसांच्या आत निर्णय देण्याचे आदेश ऑगस्ट 2022 मध्ये दिले आहेत. महावितरण कंपनीचे खांब, वीजवाहिन्या, ताण, रोहित्र शेतकर्यांची परवानगी न घेता शेतातून नेतात. ज्या शेतकर्यांच्या शेतात वरीलप्रमाणे साहित्य आहे, त्यांना त्या जागेचे भाडे देण्याचा कायदा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी सरकारकडून होत नाही. यापुढे थकलेले वीजबिल मागण्यासाठी कुणी आल्यास, त्यांना वीजपुरवठा घेतल्यापासूनचे जागा भाडे मागा. या शेतकरी हिताच्या अभियानात सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पुढार्यांनी शेतकरी म्हणून सहभागी होण्याचेही आवाहन अॅड. काळे यांनी केले.
महावितरणकडून सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करणारी तालुक्यातील सौंदाळा एकमेव ग्रामपंचायत आहे. या शेतकरी अभियानास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आयोजक शरद आरगडे म्हणाले.