श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : दोन राज्याला जोडणार्या राष्ट्रीय महामार्गाचे काम आढळगाव ते जामखेड या दरम्यान सुरू आहे. रस्ता पूर्णतः उकरला गेला असून, पर्यायी रस्त्याचा वापर वाहनांसाठी सुरू करून देण्यात आला आहे. मात्र, या पर्यायी रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी कुठलीही उपाययोजना अथवा फलक लावण्यात न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
आढळगाव ते जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता खोदला गेल्याने बहुतांश ठिकाणी पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत. हे पर्यायी रस्ते तयार करताना रस्त्याचा पृष्ठभाग रोलरच्या साहाय्याने दाबून घेतला गेला नाही. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून रस्त्यावर पाण्याचा वापर होताना दिसत नाही. पर्यायी रस्त्यासाठी फक्त मुरूम टाकला गेल्याने अनेक जणांचे अपघात झाले आहेत.
रस्ता उकरल्यानंतर जे दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहेत, ते कुठेही लावले गेले नाहीत. ज्या भागात रस्ता उकरला गेला आहे, तिथेही अपघात टाळण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र, ज्या ठिकाणी काम चालू आहे, त्या ठिकाणी सूचना फलक लावले गेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची ऐशीतैशी सुरू असून, ग्रामस्थांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.