पुणतांबा, पुढारी वृत्तसेवा : जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा समिती यांचे या योजनेकडे दुर्लक्ष झाले आहे. या योजनेतील त्रुटींबाबत सोमवारी (दि.29) विकास आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तब्बल 3 तास आंदोलन करून जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांना धारेवर धरण्यात आले. दरम्यान, या योजनेतील आवश्यक कागदपत्रे आठ दिवसांत देऊ, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
17 कोटी 37 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट व योजनेच्या त्रूटींबाबत सोमवारी विकास आघाडीने ग्रामपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी जीवन प्राधिकरण अधिकारी व पाणीपुरवठा कमिटी अध्यक्षांनी या योजना कामाकडे दुर्लक्ष केल्याने कामे दर्जाहीन झाली, असा आरोप विकास आघाडीचे नेते धनंजय जाधव यांनी केला.
वाड्या- वस्त्यांवर योजना अपूर्ण ठेवली. विरोधक म्हणून समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, कानाडोळा केला. पाणीपुरवठा योजनेच्या कामाकडे लक्ष न देता राजकारण करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत सत्ताधार्यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली विकास केला. लोक वर्गणीचा एक कलमी कार्यक्रम करून, जनतेची फसवणूक केली. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना साठवण तलावातील दगड मुरूम याची परस्पर विल्हेवाट लावली. योजना हस्तांतरित नसताना गौण खनिज याची विल्हेवाट लावून यात लाखो रुपयांचा दगड व मुरूम चोरीला गेला. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दादागिरी करुन, वाळू व मुरमाची बेकायदा वाहतूक सत्ताधार्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. यातून गुंडगिरी वाढल्याचा आरोप जाधव यांनी केला.
जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता एम. पी. बिन्नर यांनी आंदोलनाला भेट दिली. बिन्नर यांना आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांना ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांना धारेवर धरून संतप्त सवाल विचारून योजनेच्या त्रूटींसह दगड व मुरमाची परस्पर कोणी विल्हेवाट लावली, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. बिन्नर यांना भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे, अॅड. सुधीर नाईक, चांगदेव धनवटे, चंद्रकांत वाटेकर, सर्जेराव जाधव, गणेश बनकर, सुधाकर जाधव, प्रताप वहाडणे यांनी जाब विचारला.
मनसेने या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तालुकाध्यक्ष गणेश जाधव यांनी चौकशीची मागणी केली. शहरप्रमुख संदीप लाळे, अनिल निकम उपस्थित होते. अखेर शाखा अभियंता बिन्नर यांनी योजनेचे कागदपत्रे आठ दिवसांत देवू, असे पत्रात नमूद केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्या सुनंदा जाधव, रूपाली जाधव, भाऊसाहेब जेजूरकर, प्रशांत राऊत, अशोक धनवटे, संकेत जाधव, आदित्य जाधव, मधुकर जगदाळे, अण्णासाहेब डोखे, किशोर वहाडणे, संभाजी गमे, सोपान धनवटे उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाबाबत विरोधकांनी सत्ताधार्यांना जाब विचारला. दरम्यान, येणार्या काळात योजनेच्या मुद्यावरून राजकीय संघर्ष होणार आहे.