श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : आढळगाव ते जामखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या कामामध्ये सुधारणा होण्यासाठी आढळगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कामात सुधारणा न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पहिल्या टप्प्यात व्हावरा ते आढळगाव शिवारपर्यंत अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा रस्ता बनविला गेला. दुसर्या टप्प्यात आढळगाव ते जामखेड या रस्त्याची निविदा निघाली. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. मात्र, ज्या एजन्सीच्या नावे ही निविदा निघाली आहे, त्या एजन्सीने एक-एक किलोमीटरचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांना दिले आहे. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची खोदाई, मुरूम भरावीकरण अशी कामे सुरू आहेत.
रस्त्यावर वेगवेगळे ठेकेदार काम करत असल्याने त्यांच्याकडून काही ठिकाणी काळी माती भरण्यात आली. डोकेवाडी भागातही मुरुमाऐवजी काळी माती भरली गेल्याने, त्या ठिकाणचा रस्ता भविष्यात खराब होण्याची शक्यता आहे. एक-एक किलोमीटरचे मुरूमीकरण करणार्या ठेकेदाराकडे रोलर अथवा मुरूम पांगविण्यासाठी ग्रेडर नसल्याने पोकलेन मशीनच्या साहाय्याने मुरूम पांगविला जात आहे. ग्रेडरचा वापर होत नसल्याने रस्त्यावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.
याबाबत 'दैनिक पुढारी'ने आवाज उठविल्यानंतर आढळगाव ग्रामस्थांनी सुरू असलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. पर्यायी रस्ता तयार केल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही खबरदारी घेतली गेली नाही. हा रस्ता पुढील किमान पन्नास वर्षे राहणार असल्याने तो चांगल्या दर्जाचा व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्त्याच्या कामात सुधारणा होण्यासाठी आढळगाव ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आढळगाव ते जामखेड रस्त्याचे काम निकृष्ट असून, अंदाजपत्रकात नमूद बाबींप्रमाणे काम होत नाही. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना वारंवार सांगूनही, त्यांनी याकडे कानाडोळा केला. रस्त्याची खोदाईही कमी प्रमाणात केली जात असून, अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टला आढळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे आढळगावचे माजी सरपंच देवराव वाकडे यांनी सांगितले.