नगर, पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 80 गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात झेडपीचे 43, तर खासगीच्या 37 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना जवाहर विद्यालयात सहावीत प्रवेश मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षणाधिकारी प्राथमिकचे भास्कर पाटील आणि विस्तार अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात यावर्षी प्रथमच 16 हजार विद्यार्थ्यांनी नवोदयची परीक्षा दिली होती. 69 केंद्रावर ही परीक्षा पार पडली होती. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा अशा तीन विषयांचा पेपर होता. 100 गुणांसाठी 80 प्रश्न दिलेले होते. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील 43 विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर खासगी शाळांमधील 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेवाशाची सर्वाधिक 13 मुले नवोदयसाठी पात्र ठरली आहेत. यात झेडपीचे 10, तर खासगीचे 3 विद्यार्थी आहेत. यासह अकोलेत झेडपीचे 9, खासगीचे 2 विद्यार्थी असे 11 जण उत्तीर्ण झाले. कर्जतचे 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात झेडपी शाळेतील 7 आणि खासगीचे 3 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याशिवाय झेडपी आणि खासगी शाळेतील मिळून पारनेर 3, संगमनेर 9, श्रीगोंदा 5, राहाता 4, कोपरगाव 5, राहुरी 6, जामखेड 4, शेवगाव 3, नगर 3, पाथर्डी 2, श्रीरामपूर 2 असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.