नगर : पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागलेला दहावीचा निकाल काल दुपारी 1 नंतर ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये नगर जिल्ह्याचा 96.58 निकाल लागला असून, पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे पहायला मिळाले. मुलींचा 97.82, तर मुलांचा 95.64 टक्के इतका निकाल लागला आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच परीक्षा झाली. गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा झाली नव्हती. यावेळी मात्र 'शाळा तेथे परीक्षा केंद्र' अशी व्यवस्था करून परीक्षा पार पडल्या.
मार्च-एप्रिल 2022 मध्ये 10 वीची परीक्षा झाली होती. 68 हजार 901 विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचे पेपर दिले होते. यामध्ये 39 हजार 118 मुले होती, तर 29 हजार 783 मुलींनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल काल शुक्रवार दि. 17 रोजी दुपारी 1 वाजता शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर झाला.
हा निकाल पाहण्यासाठी सकाळपासूनच मुलांसह पालकांचीही आतुरता पहायला मिळाली. दुपारी निकाल समजताच अनेकांनी पेढे वाटून, तर काही पालकांनी आनंदाश्रूंना मोकळी वाट करून देताना मुलांच्या उत्कृष्ठ निकालाचा भावनिक आनंद व्यक्त केला.
अकोलेने मारली बाजी, कोपरगाव, श्रीरामपूर खाली
दहावीच्या परीक्षा निकालात अकोले या दुर्गम तालुक्याचा 98.71 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा कोपरगाव 95.03, त्याखालोखाल नेवासा 95.07 आणि श्रीरामपूर 95.07 असा लागला आहे.
1251 'रिपीटर' पेढे वाटणार
दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. जिल्ह्यातून 1546 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 1251 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर 295 पुन्हा रिपटर बनले आहेत.