नाऊर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या मंगल पवार व जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांच्यासह ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून 4 लक्ष अशा एकत्रित 16 लाख रुपयांच्या निधीतून श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन होऊन सुमारे 4 ते 5 महिने उलटून देखील संबंधित ठेकेदाराने इमारतीच्या (पायाचे खड्डे वगळता) कामाला अद्याप सुरुवात केली नसुन ही इमारत होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे बांधकाम करणारा ठेकेदार बदलण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून होत आहे.
जिल्हा परिषदच्या सदस्या पवार यांच्या जिल्हा नियोजन मंडळ जनसुविधा अंतर्गंत सुमारे 6 लक्ष रुपये तर जिल्हा परिषद सदस्य दिघे यांच्या निधीतून 6 लाख, तर ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून 4 लाख असे एकूण 16 लाख रुपये निधी असलेल्या येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे काम नेमके पूर्ण होणार कधी? असा सवाल ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित ठेकेदाराकडून वेळेत काम होत नसेल तर त्याऐवजी प्रशासनाने दुसर्या ठेकेदाराची नेमणूक करण्याची मागणीही करण्यात येत आहे. पूर्वी असलेली अनेक वर्षांपूर्वीची इमारतीची अवस्था अतिशय खराब झाली होती. अनेक भिंतींना तडे गेले होते, तर पत्र्यांमधून पाणीही गळत असल्याने जुनी इमारत ही धोकेदायक व बसण्यायोग्य नसल्याने प्रशासकीय पातळीवर निर्लेखन करण्यात येऊन तिचा लिलाव करण्यात आला होता. सदर लिलावानंतर जि.प.च्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला. मात्र, पायासाठी खोदलेले खड्डे सोडता अद्याप कोणतेही काम पुढे होऊ शकले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार जनसुविधा केंद्र असलेल्या इमारतीत सुरू आहे. ग्रामपंचायतच्या सदस्यांनाही बसायला जागा नसते, अशी अवस्था सद्यस्थितीला झाली आहे.
दरम्यान, सरपंच सोन्याबापू शिदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, गेल्या 4 ते महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊन देखील वेळकाढूपणा करत आहे. ग्रामपंचायत माध्यमातून इमारतीचे काम लवकर पूर्ण करण्याची नोटीस देखील पाठवली असून पावसाळ्यात हाल होत असून 3 ते 4 वेळा फोनवर सुद्धा सांगितले. मात्र, संबंधित ठेकेदार हा मला ठरावीक महिन्याची मुदत असून अशा नोटीस पाठवल्या, तर आणखी कितीही महिने लेट काम करील, अशी भाषा करत आहे.