पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : केळवंडी येथे बिबट्याने दोन शेळ्यांची शिकार केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाच्या अधिकार्यांनी पंचनामा केला असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून समजली.
सोमवारी रात्री अशोक शेटे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेटे यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी गोठ्यामध्ये बिबट्या शेळ्यांची शिकार करताना पाहताच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळुन गेला. एका शेळीच्या मानेवर जखमा होत्या. तर दुसरी जखमी होवुन घायाळ झाली होती. सकाळी वनविभागाचे कर्मचारी आले. त्यांनी बिबट्याच्या पायांचे ठसे पाहिले. जखमा पाहुन बिबट्याने हल्ला केल्याचे समजले. त्यांना नुकसान भऱपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. केळवंडी गावात मागील दोन वर्षापुर्वी एक मुलाचा बळी बिबट्याने घेतला आहे. त्यामुळे बिबट्याच्या आगमनामुळे पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे.
वस्तीवर राहणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाथर्डी तालुक्यातील सुमारे दोन वर्षापूर्वी मढी, केळवंडी, शिरापूर येथील तीन लहान बालकांचा बिबट्याच्या हल्यात दुर्देवी मृत्यू झाला होता. आता पुन्हा तालुक्यात बिबट्याच्या वावराने नागरीक भयभीत झाले आहे. केळवंडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असुन लोकांनी सावध रहावे व शेतामधे एकट्याने जाऊ नये. डोंगराचा भाग असल्याने बिबट्याचा वावर ह्या क्षेत्रात नेहमी असतो. घराबाहेर कोणीही झोपू नये, घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी लाईट सुरू ठेवावी. शेतकर्यांंनी रात्री एकटे बाहेर पडु नये. बिबट्या दिसल्यास नागरिकांनी वनविभागाला तात्काळ कळवावे, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी केले आहे.