वाळकी : पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील पारगाव मौला शिवारात गुरुवारी (दि.7) सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर कोंडिबा कांबळे (वय 45, रा. पारगाव मौला, ता.नगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
मयत कांबळे हे गावच्या शिवारात शेतातील वस्तीवर राहतात. गुरुवारी (दि.7) सायंकाळी त्यांनी घराच्या पाठीमागे शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले.
मयत कांबळे यांच्या पश्चात वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, 3 भाऊ असा परिवार आहे. कांबळे यांच्या आत्महत्येमागे या वर्षी पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर हे कारण असल्याची चर्चा गावच्या परिसरात सुरू आहे.