वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील 11 गावांतील पाणी दूषित आढळले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील इमामपूर, राळेगण, शिराढोण, दहिगाव, साकत, नागरदेवळे, बुर्हाणनगर, पांगरमल, उदरमल, पिंपळगाव माळवी, उक्कडगाव या गावांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याचेच समोर येत आहे. ऐन पावसाळ्यात जूनमध्ये आरोग्य विभागाने जिल्ह्यातील 2 हजार 459 पाणी नमुने तपासले. त्यापैकी 85 गावांतील 132 नमुने दूषित आढळले आहेत. त्यामध्ये नगर तालुक्यातील ही अकरा गावे आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमतिपणे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत, तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. तरीही जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यताही वाढते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अशा गावांतील जलस्त्रोताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते. वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकार्यांकडून जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत हे नमुने तपासले जातात. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.