

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : सद्गुरू गोदड महाराजांची रथयात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. रथयात्रेसाठी अक्षरशः गर्दीचा महापूर ओसंडला होता. मात्र, कोणतीही अनुचित घटना, चोर्या, छेडछाड, वाद-विवाद न घडता महिला-मुली, ग्रामस्थांना यात्रेचा मनमुराद आनंद लुटता यावा, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या उपाययोजना भाविकांसाठी उपयुक्त ठरल्या. चिंब पावसात भिजत कर्जत पोलिसांनी केलेली सेवा यात्रेकरूंना भावली. त्यामुळे अनेकांनी प्रत्यक्षात भेटून, सोशल मीडियावर कर्जत पोलिसांना अभिनंदनाचा 'सॅल्युट' केला आहे.
मागील काळात यात्रांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन घडलेल्या घटना पाहता चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरात पहिल्यांदाच नवीन उपाययोजना राबविण्यात आल्या. रथयात्रेसाठी येणारी दुकाने दोरीच्या आत व्यवस्थित लावून घेतली. भाविकाची संख्या लक्षात घेऊन हजारो वाहनांच्या पार्किंगची नियोजनबद्ध व्यवस्था केली. गुन्हे रोखण्यासाठी अनेकांना हद्दपार केले. परिसरात तब्बल 29 सीसीटीव्ही कमेरे बसविले. यात्रेत दागिने, रोकड चोरणार्यांवर पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचून 'स्टिंग ऑपरेशन' राबविले. अगदी काही तासातच तब्बल 20 चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.
नागरिक आपल्या कुटुंबासह यात्रेचा आनंद घेत असताना पोलिस त्यांच्या सुरक्षेसाठी भर पावसात सेवा बजावत होते. चौकाचौकात थांबून वाहतूक नियंत्रण करत होते. सतत पेट्रोलिंग सुरू होती. मंदिरात आणि रथ निघताना मोठा प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून पोलिस निरीक्षक यादव टीमसह स्वतः गर्दीत घुसून गर्दीवर नियंत्रण मिळवत होते. यात्रेनंतर तालुक्यातील अनेक नागरिकांना थेट पोलिस ठाण्यात जाऊन कर्जत पोलिसांचे आभार मानले. अनेकांनी सोशल मीडियावर कर्जत पोलिसांचे केलेले कौतुक पहायला मिळाले.