काष्टी; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून, अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण, खालसा दुमाला येथील आदिवासी भिल्ल एकलव्य समाज अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. राहायला हक्काचे घर नसल्याने झेंडा लावायचा कुठे? असा प्रश्न येथील आदिवासीं समाजातील लोकांना पडला आहे. येथील आदिवासी लोकांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
परंतु आजतागायत आदिवासींना या स्वातंत्र्याचा हवा तेवढा लाभ मिळालेला नाही. या गावांमध्ये आदिवासींसाठी निवासी सरकारी आश्रमशाळा होणे गरजेचे आहे. या आदिवासी गावांमध्ये अतिशय मागासलेपणा आहे. कोणी मयत झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी देखील नाही. पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, वीज नाही. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या योजनांची माहितीच त्यांना नाही. 'शासन आपल्या दारी' मार्फत सुविधा पोहोचलेल्या नाहीत.