जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला आहे. प्रत्येक पक्ष मराठा समाजाचा मतापुरताच वापर करतात. याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाची असणारी सोनेगावची ग्रामपंचायत समजली जाते.
येथील सरपंच रुपाली बिरंगळ यांनी मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण गेल्या अनेक वर्षापासुन मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुणांच्या पिढ्या नं पिढ्या बुध्दी कौशल्य असुनही नोकरी न मिळाल्याने बरबाद होत चालल्या आहेत. प्रत्येक पक्ष हा निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भुमिका घेतात. परंतु सत्ता आल्यानंतर प्रत्येक सरकारने मराठा समाजाची निराशाच केलेली आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठा समाजाचा मतापुरताच वापर करुन घेतात व आश्वासने देऊन सत्ता मिळताच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दिसुन येत नाही. अनेक वर्षे झाली मराठा समाज हा लाखो लोकांचे मोर्चे शांततेत काढून आमरण उपोषण करतात तर कित्येक युवकांनी आजपर्यंत आरक्षण लढ्यासाठी आत्महत्या केल्या आहेत.
तरी सुध्दा सरकारची आरक्षण देण्याची इछाशक्ती दिसत नाही अशा अनेक बाबींचा विचार करुन मी सुध्दा एक मराठा महिला व सोनेगांव ग्रामपंचायतची सरपंच म्हणून सोनेगांव सारख्या मोठ्या गावची सरपंच पदाची धुरा सांभाळत असतांना मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची व्यथा ऐकुण मला सुध्दा मनस्ताप होत असल्याकारणाने मला अत्यंत दुःख होत आहे. व मला सुध्दा काम करीत असतांना सरपंच पदाचा त्याग करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सोनेगावच्या सरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचे रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी सांगितले.
हेही वाचा