

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : येथील कायरा सारीजच्या संचालिका सुचिता वाघमारे यांच्या पुढाकाराने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित समारंभात विधवा महिलांनी हळदी कुंकवाचा आनंद लुटला. सहा महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. पारनेरच्या नगरसेवकांनी विशेष सभा घेऊन अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कृतीशील पाठिंबा देण्यासाठी हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सहभागी करून घेतल्याचे सुचिता वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, माजी नगराध्यक्षा वर्षा नगरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उमाताई बोरूडे, डॉ. सोनिया औटी, मंगल औटी, डॉ.रजनी मुळे, सुवर्णा गट, अर्चना औटी, संगीता दुधाचे, संगीता शेळके, मीना मेहेर, मंगल तारडे, सविता तारडे, हेमलता माळशिकरे, मंगल भालेकर, सीमा भालेकर, सुप्रिया दाते, सरला नरवडे, अर्चना गाडगे, ज्योती साळवे, स्वाती औटी, माया काळे, पूजा शहाणे, रेखा फंड आदी उपस्थित होत्या.
नगरपंचायतीच्या निर्णयाला पाठबळ
विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी पारनेर नगरपंचायतीने अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. सुचिता वाघमारे यांनी मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभात विधवा महिलांना आमंत्रित करून नगरपंचायतीच्या निर्णयाला पाठबळ दिले आहे, असे उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांनी सांगितले.
विधवांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
पतीच्या दुर्देवी निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी महिलांवर येते. त्या सक्षमपणे संसाराचा गाडा हाकतात. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. असे असताना त्यांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये दुय्यम वागणूक देणे योग्य नाही. या भावनेतून विधवा महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित केले. त्याही उत्साहाने सहभागी झाल्या, असे सुचिता वाघमारे यांनी सांगितले.