

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विखे-मुरकुटे- ससाणे गट एकत्र आल्याचे माहिती हाती आली आहे. जागा वाटपाबाबत नुकतीच मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक होवून या बैठकीत ससाणे गटाला 7, विखे गटाला 6 आणि मुरकुटे गटाला 5 जागा देण्याचे ठरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याबैठकीत ज्याने त्यांने आपापले उमेदवार ठरवायचे यावरही शिक्कामोर्तब झाले. काल रात्री 10 वा. महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबई येथील रॉयल स्टोन बंगल्यावर खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी सभापती दिपकराव पटारे यांच्यामध्ये श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.
तिनही गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढायची, संघर्ष टाळायचा असे यापूर्वीच ठरल्यामुळे केवळ कोणाला किती जागा ? यावर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार होती. त्यानुसार बाजार समितीच्या 18 जागांपैकी 7 जागा ससाणे गटाला, 6 जागा विखे गटाला आणि 5 जागा या मुरकुटे गटाला देण्याचे यावेळी सर्वानुमते ठरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यातही सोसायटी मतदारसंघातून प्रत्येकाला 2 जागा देण्याचे ठरले.
याशिवाय आरक्षित मतदारसंघातून प्रत्येकाला एक किंवा दोन जागा देण्याचे ठरले. यामध्ये ओबीसीची जागा ही ससाणे गटाला देण्याचे ठरले तर महिलेची प्रत्येकी एक जागा विखे आणि मुरकुटे गटाला देण्याचे ठरले असल्याचे समजते. याशिवाय ग्रामपंचायत मतदार संघातील 4 जागांपैकी प्रत्येक गटाला एक जागा देण्याचे ठरले. याशिवाय आरक्षित मतदार संघाची एक जागा मुरकुटे गटाला देण्याचेही ठरल्याचे समजते.
जागा वाटपामध्ये एखादी जागा इकडे, तिकडे ऐनवेळी उमेदवार पाहून झाला तर त्याला तिनही गटाने संमती देवून संयुक्तिकरित्या निर्णय घ्यायचा असेही यावेळी ठरले. मात्र, फॉर्म्युला जो ठरला त्याप्रमाणे जागा तिनही गटाला द्यायच्या मात्र मतदारसंघामध्ये एखाद्या दोन जागेचा बदल झाला तर तो स्विकारायचा आणि त्यातून एकत्रित मार्ग निवडणुकीला सामोरे जायचे, असेही यावेळी ठरले असल्याचे कळते.
श्रीरामपूर तालुक्यातील सोसायट्या, ग्रामपंचायती यांच्या मतदारांची संख्या पाहता आणि कोणत्या सोसायटया आणि ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत, याची संख्या पाहता बाजार समितीच्या निवडणुकीत विखे – मुरकुटे – ससाणे यांचे पॅनल हे भक्कम होणार असल्याचे दिसते.
आता या विखे-मुरकुटे-ससाणे गटाच्या विरोधात आ. लहू कानडे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक आणि शेतकरी संघटना कशाप्रकारे पॅनल उभे करते आणि कोण उमेदवार उभे करतात ? यावर बाजार समितीच्या निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या गुरुवारी 20 एप्रिलला दुपारी 3 पर्यंत माघारीची मुदत आहे.
आगामी निवडणुकाही एकत्र लढणार का?
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विखे – मुरकुटे ससाणे यांची युती झाल्यामुळे या बैठकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही ही युती कायम राहणार का ? याची उत्सुकता सर्वांना आहे. याबाबत कालच्या बैठकीत काही चर्चा किंवा सूतोचाच झाले काय ? याची माहिती घेतली असता श्रीरामपूर बाजार समिती सोडून या बैठकीत इतर निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही. इतर निवडणुकांबाबत त्या त्या वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचेही यावेळी ठरल्याचे समजते.