टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारची जल जीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी संकल्पना असून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी दिले जाणार आहे. पाण्याची उपलब्धता करण्यासाठी 'नदीजोड' हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेला असल्याने कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरीकांशी संवाद वाढवून लाभाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रीया आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले.
टाकळीभान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित केलेल्या भाजपा संघटनात्मक बुथ कमेटीच्या बैठकित पटेल बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दिपक पटारे, ओबीसी सेलचे प्रकाश चित्ते, माजी सभापती नानासाहेब पवार, शरद नवले, बबन मुठे, गिरधर आसने आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री पटेल म्हणाले की, जलजीवन मिशनद्वारे प्रत्येक घरात मानसी 55 लिटर पाणी देण्यात येणार आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 18 टक्के लोकसंख्या भारत देशाची आहे. त्यामानाने 4 टक्के एवढेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी नदीजोड हा महत्वकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. 2024 पर्यंत खेड्यात व गावात घराघरात नळाचे पाणी या मिशनद्वारे पोहचवले जाणार आहे.
पटेल पुढे म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळेची शिस्त पाळावी व लाभाच्या योजना तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. बुथ कार्यकर्त्यांचा नागरीकांशी संवाद असलाच पाहिजे, असे सांगून त्यांनी श्रीरामपुर विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील भाजपाच्या कामाचा आढावा मांडला.
यावेळी नानासाहेब शिंदे, विठ्ठलराव राऊत, गिरिधर आसने, गणेश मुद्गुले, युवा तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, नितीन भागडे, शंतनू फोपसे, सतीश सौदागर, मारुती बिंगले, गणेश राठी, प्रफुल्ल डावरे, रुपेश हरकल, महिला आघाडीच्या रेखा रिंगे, अनिता शर्मा, सुप्रिया धुमाळ, मिलिंदकुमार साळवे, कृष्णा वेताळ, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, राहुल पटारे, चंद्रकांत थोरात, भारत गुंजाळ, बुथ कमेटी सदस्य व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नारायण काळे यांनी केले तर सुत्रसंचलन मुकुंद हापसे यांनी केले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा जात-पात न पाळणारा पक्ष
पाण्याच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व असून भविष्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पुन्हा वापरण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आसल्याचे सांगून भाजपा हा जात धर्म न पाळणारा पक्ष असल्याने नागरीकांना सुविधा देण्याचे काम भाजपा करीत असल्याचे मंत्री प्रल्हादसिंह पटेल यानी सांगितले.