कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा: कोपरगावात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून सोमवारच्या पावसाने आठवडा बाजाराची दाणादाण झाली. गोदावरी नदीपात्रात 25 हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे. शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले होते. पावसात विज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वीजपुरवठा खंडित अन् रस्तेही निर्मनुष्य असल्याने व्यवसायिकांनी दुकाने बंद करत कुटुंबियांसोबत दिवस घालविल्याचे दिसून आले.
सखल भागात पाण्याची लोंढे अनेकांच्या घरातून वाहिले. काही प्रभागात गटारी तुंबल्याने त्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सखल भागात राहणार्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.