शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : गुरू पौर्णिमेनिमित्त (Guru Pournima) श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शनिवारी (दि.20) ते सोमवार (दि.22) तीन दिवसीय उत्सव साजरा होत असून त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. संस्थानाच्यावतीने भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे ते शिर्डी मार्गावरुन येणार्या पालख्यांना थांब्यांचे ठिकाणी साधारण 36 हजार चौ.फुट पावसाळी मंडप उभारण्यात आले आहे. (Saibaba Shirdi Temple)
देशाच्या कानाकोपर्यातुन साईभक्त श्री गुरुपौर्णिमा उत्सवाकरीता शिर्डीत येतात. भाविकांची दर्शन व निवासाची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून संस्थानाच्यावतीने मंदिर व परिसरात तसेच सर्व निवासस्थानी साधारण 63 हजार 133 चौ.फुट पावसाळी मंडप उभारण्यात आलेले आहे. मंदिर, निवासस्थान आणि श्री साईप्रसादालय या ठिकाणी ये-जा करण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षित वाडा, दर्शनरांग, नवीन भक्तनिवासस्थान, साईआश्रम, श्री साईप्रसादालय आणि मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप येथे प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे.
गुरूपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी (दि.21) समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. या दिवशी श्रींची शेजारती व सोमवारी पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहे.
गतवर्षी श्री गुरूपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात श्री साई प्रसादालयामध्ये 1 लाख 54 हजार 946 साईभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला होता. तसेच 2 लाख भक्तांनी मागील वर्षी साईमंदिराला भेट दिली होती. त्यामुळे यंदा 2 लाख साईभक्त श्री गुरूपौर्णिमा उत्सवात प्रसाद भोजन घेतील यादृष्टीने नियोजन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशीतीन दिवस भक्तांसाठी वेगवेगळ्या क्रार्यक्रमांचे आयोजन शनिवारी पहाटे श्रींची काकाड आरती, त्यानंतर श्रींचे फोटो व पोथीची मिरवणुक, व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, श्रींचे मंगलस्नान व दर्शन, श्रींची पाद्यपुजा, स्वरधुनी साईगीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक निघणार आहे. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहणार आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी (दि.21) पहाटे वाजता श्रींची काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन,श्रींची पाद्यपुजा, रात्री दिल्लीचे नीरज शर्मा यांचा भजन संध्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे.
उत्सवाच्या सांगता दिनी सोमवारी (दि.22) पहाटे श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी श्रींची पाद्यपुजा, गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. सायंकाळी श्रींची धुपारती होईल. त्यानंतर मुंबईतील ग्यानेश वर्मा यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. त्यानंतर श्रींची शेजारती होणार आहे.