संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे शुक्रवारी (दि.2) मध्यरात्री संतोष तुकाराम मगर यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी 30 हजाराच्या रोख रक्कमेसह तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे. याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे त्यांची दुचाकी घटनास्थळी टाकून देत दुसर्याची दुचाकी घेऊन पळून गेले आहेत. याबाबत संतोष मगर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आमच्या बंगल्याचे तारीचे कंपाऊंड कटरच्या साहाय्याने कट केले.
यानंतर बंगल्याच्या किचनच्या बाजूला असलेल्या दरवाजाची कडी कटावणीच्या साहय्याने उचकटवून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाची उचकापाचक करून 30 हजार रुपये रोख, दोन तोळे वजनाचा नेकलेस तसेच एक तोळे वजनाची चैन असा 63 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला. माणसे आपल्या घराकडे येत असल्याचे पाहून चोरट्यांनी हीरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स दुचाकी (एमएच 17 डब्लू 7923) ही जागीच सोडून पळ काढला.