नगर : पुढारी वृत्तसेवा : दौंड-नगर द्रुतगती (डबल लाईन) रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलवंडी ते विसापूर या 15 किलोमीटर अंतराची गुरूवारी (दि 9) घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. लवकरच नगर ते दौंडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते दौंड द्रुतगती रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते मनमाड अशा 7 टप्प्यांची चाचणी घेण्यात आली. नगर ते मनमाड अशा 96 किलोमीटर डबल लाईन रेल्वेमार्गाची चाचणी घेण्यात आली. मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग सिंगल लाईन असल्याने रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच, सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता.
त्यामुळे तासन्तास रेल्वेगाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागत असे. मात्र, आता हा पूर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्याने, विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच, या कामामुळे रेल्वे ताशी 120 प्रति किलोमीटर वेगाने धावणार असल्याने प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. गुरूवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते दौंडपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागेल, असा अंदाज उपमुख्य अभियंता प्रदीप बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशासकीय अधिकारी विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता प्रदीप बनसोडे, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनिअर प्रशांत कुमार, सिनियर सेक्शन इंजिनिअर अजय राणा, आर. डी. सिंग, सुधांशू कुमार, रामजी कुमार आदी उपस्थित होते.
रेल्वेगाडीचा काढला नेमका वेग
बेलवंडी ते विसापूर डबललाईन (द्रुतगती) रेल्वे मार्गाच्या तिसर्या टप्प्याची चाचणी गुरुवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल, असे उपमुख्य अभियंता (बांधकाम) प्रदीप बनसोडे यांनी सांगितले.
..