नगर : तलाठी कार्यालयांचे रुपडे पालटणार

नगर : तलाठी कार्यालयांचे रुपडे पालटणार

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील 25 तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी 5 कोटी 33 लाख 20 हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. जुन्या तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा व काही तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात कोपरगाव तालुक्यातील 25 तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद केली होती. त्यांची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे आ. काळेंनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयांच्या इमारती जुनाट झाल्या होत्या. त्याचबरोबर काही तलाठी कार्यालयांना स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यामुळे या इमारतीमध्ये तलाठी व महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना काम करण्यात अनंत अडचणी येत होत्या. त्याचा त्रास तलाठी कार्यालयात काम घेवून येणार्‍या सर्व सामान्य नागरिकांबरोबरच तलाठी व महसूलच्या कर्मचार्‍यांना देखील होत होता.
शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची सेवा देणारा तलाठी कार्यालय हा अतिशय महत्वाचा भाग असुन शेतकरी व नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या तलाठी कार्यालयाचे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्व अनन्यसाधारण आहे. शेती बाबतचे दस्ताऐवज व नोंदी या तलाठी कार्यालयात असल्यामुळे तलाठी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त नेहमीच ये-जा असते.

एवढी महत्वाची जबाबदारी तलाठी कार्यालय पार पाडत असतांना या कार्यालयांच्या अनेक इमारतींची मात्र दुरावस्था झाली होती तर काही तलाठी कार्यालयांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे मिळेल, त्या जागेत कारभार सुरु होता. याची आ. आशुतोष काळे यांनी दखल घेवून त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून आ. आशुतोष काळे या तलाठी कार्यालयांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध होवून काम सुरु व्हावे, यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून 25 तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी 5 कोटी 33 लाख20 हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

दुरावस्था झालेल्या व ज्या तलाठी कार्यालयांना स्वतःच्या इमारती नव्हत्या त्या सर्व तलाठी कार्यालयांच्या इमारतीचा प्रश्न आ. काळे यांनी सोडविल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांना व महसूल कर्मचार्‍यांना येत असलेल्या अडचणी सुटणार आहे. त्यामुळे वरील 25 गावे व ज्या गावांना या तलाठी कार्यालयाशी जोडलेले आहे. त्या गावातील शेतकरी व नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

या कार्यालयांचे होणार नूतनीकरण
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोर्‍हाळे, धोत्रे, काकडी, पोहेगाव, वारी, चास नळी, शिंगणापूर, संवत्सर, मंजूर, कोकमठाण, मढी बु., चांदेकसारे, पढेगाव, ब्राम्हणगाव, धारणगाव, करंजी, येसगाव, तिळवणी, गोधेगाव, धामोरी, वेस, मळेगाव थडी, रांजणगाव देशमुख, जेऊर कुंभारी व कुंभारी या गावातील तलाठी कार्यालयांचे नुतणीकरण होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news