

नगर; पुढारी वृत्तसेवा : नव्याने सुरू होणारी मुंबई-साईनगर (शिर्डी) वंदे भारत रेल्वे पुणे- नगरमार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सुप्रिया सुळे आदींना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले.
शिर्डीला जाण्यासाठी पुण्याहून केवळ एकच रेल्वे आहे. तीही आठवड्यात केवळ चार दिवस धावते. तसेच, नगर-पुणे इंटरसिटी किंवा नगर-मुंबईची मागणीही अनेक वर्षांपासून आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल्सपासून (सीएसटी) सुरू होणारी वंदे भारत ट्रेन नाशिक, मनमाडमार्गे शिर्डीला येणार असल्याची माहिती आहे.
पुणे ते नगर इंटरसिटी रेल्वेची मागणी अनेक वर्षांपासून आहे. ही नवीन वंदे भारत ट्रेन पुणेमार्गे सुरू केल्यास व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि साई भक्तांना याचा फायदा होणार आहे. दररोज नगर -पुणे प्रवास करताना महामार्गावर वाहतूक कोंडी, अपघात, बराच वेळ प्रवासात जातो. रेल्वे प्रशासनाने वंदे भारत नगरमार्गे सुरू केल्यास नगर-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी कमी होऊन अनेक लोकांचा वेळ वाचणार असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणने आहे.
या मागणीसाठी संघटनेचे हरजीतसिंह वधवा, क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मुनोत, स्थानिक रेल्वे सल्लागार समिती सदस्य विपुल शहा, अशोक कानडे, संदेश रपारिया, सुनील छाजेड, संजय सपकाळ, संजय चव्हाण, अजय दिघे, संजय वाळुंज, संतोष बडे, महेश शहाणे आदी प्रयत्नशील आहेत.
'पुणेमार्ग शिर्डी अंतर सारखेच'
मुंबईतून मनमाडमार्गे शिर्डीला दर चार दिवसाला एक रेल्वे आहे. मुंबई-नाशिकमार्गे मनमाडला येण्यासाठी दर अर्ध्या तासाला गाड्या व इंटरसिटी आहे. मनमाडला उतरल्यानंतर रस्त्याने शिर्डीला जाण्यासाठी वाहतुकीचे बरेच साधने उपलब्ध आहेत. मुंबईमार्गे शिर्डी 350 कि.मी. आणि पुणेमार्ग शिर्डी अंतर सारखेच आहे.
नगरसह पुणेकरांचा फायदा : वाधवा
मुंबई-पुणे-दौंड-नगर- शिर्डी, अशी एकच रेल्वे असून, तिची वेळ मुंबई व शिर्डी येथून जाताना रात्रीची असल्याने प्रवाशांना गैरसोयीचे ठरते. वंदे भारत पुणेमार्गे नेल्यास जिल्ह्याला फायदा होणार आहे. पुणेकरांनाही याचा फायदा मिळेल, अशी अपेक्षा प्रवासी संघटनेचे हरजीतसिंह वधवा यांनी व्यक्त केली.