श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : पानिपत ही महाराष्ट्राची शौर्यगाथा असून, श्रीगोंदा आणि पानिपत यांचा खूप घनिष्ट संबंध आहे. याच वेशीतून अनेक वीर लढण्यासाठी गेले होते आदींना उजाळा देत, या वेशीच्या संवर्धनासाठी श्रीगोंदेकरांनी पुढाकार घेतल आहे. पूर्वजांच्या स्मृतींची आठवण म्हणून एक सोहळा आयोजित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील तरूण पानिपतावर कामी आला. श्रीगोंद्याचे पाटील दत्ताजी शिंदे, जानराव वाबळे यांनी बुराडी घाटावरील पराक्रम गाजवला. त्यांचे नजीब खानाला दिलेले बाणेदार उत्तर इतिहासात अजरामर आहे. खानाने विचारले, क्या पाटील लढोगा क्या?', तर 'बचेंगे तो और भी लढेंगे!', असे सरदार शिंदे घराण्यातील जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि गावोगावच्या हजारों लाखो अनामिक मावळ्यांनी देशासाठी शौर्य गाजवले.
पानिपत वीरांच्या पराक्रमाची साक्षीदार श्रीगोंद्यातील दिल्ली वेस. याच वेशीतून शिंदे सरदार आणि हजारों सैन्य उत्तरेकडे पानिपत लढाईला गेले. परंतु, परत कधीच माघारी आले नाही. देश रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. पानिपतावर देव देश धर्मासाठी मराठी मूलूखापासून कोसो दूर आपल्या प्राणांची आहुती देणार्या सर्व ज्ञात-अज्ञात मराठा वीरांना श्रीगोंदेकरांतर्फे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने 262 दिवे लावून आणि सर्वांना अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत युद्ध झाले. यावर्षी 262 वर्ष पूर्ण झाले आहेत.
श्रीगोंदेकरांचे कर्तव्य म्हणून आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली, शौर्यशाली, स्मृतींना पानिपत शौर्य दिवस म्हणून उजाळा देण्यात आला, तसेच आदरांजली अर्पण करण्यात आली. यावर्षी या उपक्रमाचे दुसरे वर्ष होते.श्रीगोंदा शहरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून हा आपल्या पूर्वजांचा पराक्रमी सोहळा आणि शौर्य गाथा अनुभवली. हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या मावळे व रणरागिणीनीं योगदान दिले. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींची आठवण म्हणून हा सोहळा आयोजित केला. पानिपत विरांचा पदस्पर्श लाभलेली ही वेस आहे. ही वेस जतन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे प्रयत्न सुरू आहेत.
लवकरच लोक सहभागातून हा वारसा जतन केला जाईल. यानिमित्ताने श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाने वेस स्वच्छता करून सहकार्य केले. शिवदुर्ग परिवारातील सर्व सहभागी शिलेदारांनी वेसिला फुलांच्या माळांनी सजवली. प्रतिभा इथापे यांनी सुंदर रांगोळी काढली. सर्व रणरागिणीनी दिव्यांची सुंदर आरास केली. सूर्य मावळतीला गेल्यानंतर सर्वांनी मातीचे दिवे लावले. मान्यवरांच्या हस्ते पानिपत वीरांच्या प्रतिमांचे आणि वेशीचे पूजन करण्यात आले.आविष्कार इंगळे यांने छत्रपती शिवरायांची गारद दिली. मारूती वागस्कर यांच्या साथीने उपस्थितांनी 'जय-जय महाराष्ट्र माझा' हे गीत गायिले. यावेळी शिवदुर्ग परिवाराचे 50 पेक्षा जास्त स्वयंसेवक, संचालक, शिलेदार, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, संघटक, समन्वयक उपस्थित होते. श्रीगोंदाचा अभिमान असलेली वेस जतन आणि पानिपत शौर्य दिवस दरवर्षी साजरा केला जाईल.
पानिपत वीरांचा वारसा असणारी ही वेस संवर्धन व्हावी वेशीवरील रंग काढून टाकावेत. पुन्हा आहे तशी वेस निर्माण व्हावी. यासाठी सर्वांनी आग्रह धरला. श्रीगोंदा दिल्ली वेसचा इतिहास सांगण्यात आला. लोकसहभाग, पत्रकार आणि प्रशासन सर्वांची साथ हवी आहे, असे शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सांगितले.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवारातर्फे वेशीवरील जाहिरात रंग काढल्यानंतर वेस अशी सुंदर असेल. प्रतिभा इथापे यांनी काढलेल्या तैल चित्राचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.