कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सतत आधुनिकीकरणाची कास धरत सहकारी साखर कारखानदारीने स्पर्धेत मागे न राहता त्याला सामोरे जाण्यासाठी सातत्याने उपाययोजना सांगून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने एकाच दिवशी ३० डिसेंबर रोजी उच्चांकी ६३५४ टन उसाचे गाळप करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. त्याबद्दल व्यवस्थापन व संचालक मंडळाने कामगारांचे विशेष अभिनंदन केले आहे.
गेल्या ५ वर्षापासून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे विशेष लक्ष देऊन दैनंदिन गाळप क्षमतेबरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प तसेच उसाच्या रसापासून थेट इथेनॉलची निर्मिती, औषध निर्मिती प्रकल्प उभारणी यात सातत्याने सुधारणा करीत आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील साखर कारखानदारीला आधुनिकीकरण किती महत्त्वाचे आहे? त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत? याचे मार्गदर्शन वेळोवेळी केलेले होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उसाच्या लागवडीपासून थेट तो गाळपासाठी तोडून आणण्याबाबतचे सर्व नियोजन उपग्रहाद्वारे करून त्याबाबत निर्माण होणाऱ्या अडीअडचणी सोडवल्या.
ज्यादा ऊस उत्पादन आणि उतारा देणाऱ्या विकसित ऊस जातीचे बेणे थेट कोईमतुर येथून आणून शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून ऊस विकास विभागामार्फत त्याचे संपूर्ण नियोजन केले. गेल्या दोन वर्षापासून पर्जन्यमान चांगले होत असल्याने शेतकऱ्यांच्या प्रति एकरी ऊस उत्पादनात निश्चितच चांगली वाढ झाली आहे. कमी खर्चात जास्तीचे ऊस उत्पादन शेतकऱ्यांना कसे मिळेल याबाबत अभ्यासू नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे सातत्याने लक्ष देत आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने एकाच दिवशी ६३५४ टन उसाचे विक्रमी गाळप केल्याने कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व सर्व संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.