नगर : पुढारी वृत्तसेवा : पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील ज्या शेतकर्यांनी अद्यापपर्यंत पीक पाहणी नोंदविली नाही, अशा शेतकर्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे तत्काळ पीक पाहणी नोंदवावी, असे आवाहन नगर तहसीलदार उमेश पाटील यांनी केले. आपापल्या शेतातील पीक पाहणी मोबाईल अॅपवरुन करण्याची सुविधा शेतकर्यांना शासनाने दिलेली आहे.
ई-पीक पाहण्यासाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ अॅप तयार करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सुचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदविण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. ज्या शेतकर्यांनी पिकाची नोंदणी केली नाही. अशा शेतकर्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी व्हर्जन 2 हे अॅप डाऊनलोड करुन तात्काळ ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील व नगर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव बेल्हेकर यांनी केले आहे. काही अडचणी निर्माण झाल्यास मंडलाधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.