![नगर: उप अधीक्षकांच्या खुर्चीला घातला पुष्पहार, भूमि अभिलेख कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केले आंदोलन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2FWhatsApp-Image-2023-04-25-at-7.50.50-AM.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नगर, पुढारी वृत्तसेवा: भूमीअभीलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता न आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. उपअधीक्षक गजानन पोळ यांच्या निषेधार्थ त्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
या कार्यालयात नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येत असतात. मात्र, उपअधीक्षक पोळ यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ते कायमस्वरूपी गैरहजर राहत असतात. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. राज्य शासन जनतेचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र, उपअधीक्षक पोळ हे नागरिकांना कधीच भेटत नाही. नागरिकांचे प्रश्न समजावून घेत नाहीत. प्रश्न मार्गी लागण्यासाठी वर्षभर हेलपाटे मारावे लागत आहेत.
येत्या आठ दिवसात कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता न आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी दिला. यावेळी विपूल शेटिया, मळू गाडळकर, विजय सुंबे, पप्पू पाटील, अनिकेत चव्हाण, गणेश बोरूडे, विशाल बेलपवार आदी उपस्थित होते.