राहुरीकरांचा स्थानिक नेत्यांवरच दृढ विश्वास

राहुरीकरांचा स्थानिक नेत्यांवरच दृढ विश्वास
Published on
Updated on

रियाज देशमुख

राहुरी (नगर) : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मतदारांनी पुन्हा तनपुरेंनाच कौल दिला. माजी सभापती अरूण तनपुरे यांच्या विकासकामांवर मतदारांनी भरभरून विश्वास दर्शविल्याने 18 पैकी 16 जागांवर तनपुरेंच्या उमेदवारांचा विजय झाला. परिवर्तन होणारच? अशी आरोळी देणार्‍या खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांना मतदारांनी कात्रजचा घाट दाखविला.
नगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार्‍या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीला विकासाच्या उंच आलेखापर्यंत नेणारे माजी सभापती अरूण तनपुरे यांच्या विकासकामांची जिल्हाभर चर्चा होती.

परंतु खासदार डॉ. विखे व माजी आमदार कर्डिले यांनी राहुरीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकमेकांच्या हातात हात देत तनपुरेंचा गड खालसा करण्याचा निश्चय व्यक्त केला होता. बाजार समितीतील तनपुरेंचे बस्तान उठविण्याच्या घोषणा देत विरोधी विखे-कर्डिले यांच्या विकास मंडळाने हुंकार फुंकली होती. गावागावामध्ये बैठका घेत विखे-कर्डिले गटाने तनपुरेंच्या कामकाजावर शरसंधान साधले होते.

दरम्यान, सत्ताधारी तनपुरे गटाने विरोधकांच्या टीकेला अधिक न जुमानता मतदारांची जोड बेरीज सुरू ठेवत कार्यकर्त्यांशी संवाद सुरूच ठेवला होता. निवडणूक सुरू झाल्यापासून राज्याचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांसह माजी सभापती तनपुरे, हर्ष तनपुरे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली. यामध्ये स्व. शिवाजीराजे गाडे यांच्या शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही तनपुरेंना पाठबळ देण्याचा निर्णय घेत निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाच्या विजयासाठी कंबर कसली होती.

विखे-कर्डिले गटाने कोणत्याही परिस्थिती तनपुरेंचा गड खालसा करण्याचा उद्देश हाती घेत वेगवेगळी व्यूवहरचना आखली होती. तर तनपुरे गटाने गावागावामध्ये मतदारांशी संवाद साधताना कोणतीही हाराकिरी होणार नाही, याची काळजी घेतली होती. राहुरीत नात्यागोत्यांचे राजकारण जोमात चालते. त्यामुळे दोन्ही गटाकडून नात्यागोत्यांपेक्षा पक्षाचा उमेदवारच कसा निवडून येणार? याची काळजी घेतली गेली.

महिनाभरापासून सुरू असलेला प्रचाराचा धुराळा संपला. काल 28 एप्रिल रोजी मतदान झाले. सायंकाळी मतपेट्या उघडताच तनपुरे गटावर मतदारांनी भरभरून प्रेम दर्शविल्याचे दिसून आले. 18 पैकी 16 उमेदवार तनपुरे गटाकडून विजयी झाले. तर विखे-कर्डिले गटाचे देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष शामराव निमसे हे कसेबसे विजयी झाल्याचे दिसून आले. निवडणुकीत माजी सभापती अरुण तनपुरे यांना सर्वाधिक मते मिळाली.

विखे-कर्डिलेंना डॉ. तनपुरे कारखान्याचा फटका

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात असलेला डॉ. तनपुरे कारखाना बंद पडला. प्रशासक आल्यानंतरही कारखान्याची परिस्थिती बिकटच आहे. कारखाना बंद असल्याचा सर्वाधिक तोटा विखे-कर्डिले यांना बाजार समितीच्या निवडणुकीत सहन करावा लागला.

तनपुरेंसाठी विकासकामे आली धावून

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी सभापती अरुण तनपुरे यांची सन 1986 पासून एकहाती सत्ता आहे. सत्ता काळात तनपुरे गटाने राहुरी बाजार समितीला विकासकामांबाबत उंचावर नेले. शेतकरी, व्यापारी व श्रमिकांसाठी विशेष सेवा देताना बाजार समितीच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा आहे. जिल्ह्यातील एकमेव नफ्यातील बाजार समिती म्हणून राहुरी बाजार समितीचा गौरव होत असल्याचा लाभ तनपुरे गटाला लाभल्याचे दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news